नारायणगाव (वार्ताहर) – “नागरिक हो तुमच्यासाठी’ गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनातील सर्व विभाग व अत्यावश्यक सेवा देणारे घटक आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र नागरिकांकडून करोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी जे सहकार्याची भूमिका हवी होती; ती मात्र नारायणगाव व परिसरातील नागरिकांकडून दिसून येत नाही.
आज (दि. 11) नारायणगाव एसटी स्टॅन्ड समोर पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चार दिवसांपासून राज्य सरकारने लॉकडाऊनची तीव्रता थोडीशी शिथील करून काही दुकाने उघडण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली आहे. नागरिकांनी सध्या अत्यावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडून पुन्हा लवकर घरी जाणे गरजेचे असताना अनेकजण स्वतःचा व कुटुंबाबरोबर नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्क बांधणे, सुरक्षित राहणे, सॅनिटायझरचा वापर करणे, स्वतःची काळजी घेणे, गर्दीमध्ये जास्त न जाणे-येणे अशा बाबींचे पालन होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाला कठोर भूमिका घेणे अवघड जात आहे.
सूट देताच निष्काळजीपणा
दोन महिने नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले. आत्ता शेवटच्या टप्प्यात सूट देताच निष्काळजीपणा दिसून येत आहे. नारायणगाव ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील येण्याजाण्याचे सर्व रस्ते बंद ठेवून एसटी स्थानकाशेजारील जुन्नर रोड सुरु ठेवला आहे; परंतु गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. पूर्व वेस ते महामार्गापर्यंत सकाळपासून गर्दी झाली होती.