अंदमान – मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडका वाढला आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिकही हैराण झाले आहे. मात्र आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा अंदमानमध्ये तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. नानकोवरी बेटावर मान्सूनने हजेरी लावली आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो, मात्र यंदा लवकर मान्सून दाखल झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
अंदमानात तीन दिवस अगोदरच दाखल झालेला मॉन्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचे आगमन होते. यंदा मात्र तीन दिवस उशीर केरळमध्ये मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. तर जून ते सप्टेंबरमध्ये 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.