वडगाव मावळ – राज्यातील कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. 2017 सालापासून हे पुरस्कार रखडले असून, विशेष म्हणजे करोना प्रादूर्भावापूर्वीचे हे पुरस्कार आहेत. राज्यभरातील एकूण 198 शेतकऱ्यांना घाऊक स्वरूपात येत्या सोमवारी (दि. 2) विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कृषि, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन- उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारार्थींना रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व सपत्नीक, पतीसह सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्ये कार्य करणार आहेत.
सन 2020 पासून विविध कृषि पुरस्कार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले असून यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार संख्या 10 वरुन 8 करण्यात आली आहे.
राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांची संख्या 25 वरुन 40 करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्कार संख्या 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 3 वरुन 8, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार 9 वरुन 8 करण्यात आली आहे. सन 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्पर्धा रब्बीच्या तालुका, जिल्हा ,विभाग व राज्य पातळ्यांवरील बक्षीसांच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे.