नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून दिलेल्या संदेशावर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज प्रधान शोमनचे भाषण ऐकले. त्यात लोकांची दुख:, त्यांच्या आर्थिक अडचणी आणि अन्य बोजा कसा दूर करायचा या विषयी कोणताहीं उल्लेख नाही.
भविष्यात यावर काय नियोजन आहे किंवा त्याविषयी काय व्हिजन आहे याचाही या भाषणात उल्लेख नाही. केवळ स्वताची प्रसिद्धी करण्याची हौस असलेल्या पंतप्रधानांचा हा केवळ एक फील गुड निर्माण करण्याचा प्रयास आहे, अशा शब्दात थरूर यांनी या निवेदनाची खिल्ली उडवली आहे.
मोदींनी आजच्या आपल्या संदेशात लोकांना रविवारी घरातील वीज बंद करून रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलीत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या संदेशावर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात असल्या तरी पंतप्रधानांनी प्रत्यक्ष उपाययोजनांच्या संबंधात काही तरी सुतोवाच करणे अपेक्षित आहे अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. थरूर यांनी याच प्रतिक्रियांना वाट करून दिली आहे.