सातारा, (प्रतिनिधी) – कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांनी अफाट काम केले. छ. शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्याकाळात वहिनीनी जो त्याग केला त्याला तोड नाही. वहिनींच्या दातृत्वाच्या मूळाशी खूप मोठा त्याग आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून रयतचा आदर्श समाज घेत आहे.
चांगल्या कामाला सहाय्य करण्याचा आनंद खूप मोठा असतो, वाहिनीना तो मिळाला. कर्मवीर आणि लक्ष्मीबाई अफाट धैर्याचा व त्यागाचा विचार नव्या पिढीने करून त्यांच्या व दातृत्वाची वृत्ती गावोगाव समाजात पसरवली पाहिजे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडीटर, प्राचार्य विश्वासराव काळे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या सर्व स्थानिक शाखांच्यावतीने श्री.छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस शाखा क्रमांक १ धनिणीची बाग येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ वहिनी यांच्या ९४ व्या पुण्यतिथी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील होते. सचिव विकास देशमुख,अॅड.दिलावर मुल्ला,उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, माध्यमिक विभाग सहसचिव .बी.एन.पवार,ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अनिल पाटील म्हणाले की ‘वहिनींचा जन्म १८९४ चा. १९३० ला त्यांचे अकाली निधन झाले. त्यांना मिळालेल्या ३६ वर्षाच्या आयुष्यात शेवटच्या ५ वर्षात त्यांनी जे काम केले ते खूप मोठे आहे. शाहू बोर्डिंगची स्थापना १९२४ ला अवघे ५ विद्यार्थी घेऊन झाली. १९३० पर्यंतचा विचार केला तर शाहू बोर्डिंगचा खर्च १०, ४४४ रुपये इतका होता.
आणि समाजातून देणगी अवघी १५९ रुपये विद्यार्थ्यांचा खर्च भागवणे शक्य नव्हते अशावेळी अण्णांनी घरातील जे होते ते सारे घातले. विहिरीला रहाट बनवण्यासाठी त्यांनी वडिलांची पॉलीसी मोडली. अण्णा या काळात बोर्डिंगसाठी धान्य व देणग्या गोळा करण्यासाठी जात असत. त्यावेळी वसतिगृहाची सर्व जबाबदारी वहिनीनी घेतली म्हणून तर रयत शिक्षण संस्था उभी राहिली. त्यांच्या अंगावर असलेले सगळे सोन्याचे दागिने त्यांनी मोडले.
प्रारंभी कर्मवीर व सौ,लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. संभाजी पाटील व सहकारी यांनी कर्मवीर गीत गंधाली हा कार्यक्रम सादर केला.
प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव विकास देशमुख म्हणाले की लक्ष्मीबाई यांचे धैर्य आणि त्याग मोठा आहे. स्वतःच्या पतीबरोबर असताना आजसुद्धा स्त्रिया एवढ्या धडाडीने काम करू शकत नाहीत.
या कार्यक्रमात साहेबराव घाडगे गुरुजी , शांताराम आवटे ,जनरल बॉडी सदस्य पल्लवी सागर वर्धमाने यांनी 25 हजार रुपये देणगी दिली. रा.ब.काळे शाळेचे लक्ष्मी फंड रुपये 53650 संकलित करणारे पालक प्रातिनिधी व मुख्याध्यापक अमोल कोळेकर ,इत्यादी देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. सहसचिव बी.एन.पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले.
कार्यक्रमास कर्मवीर कुटुंबीय, मॅनेजिंग कौंसिल सदस्य जगदाळे, जनरल बॉडी सदस्य डॉ. अशोक भोईटे, हणमंतराव भोसले, लालासाहेब खलाटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, दिनेश दाभाडे, एन. टी. निकम, संभाजी पाटील, आर. के. शिंदे, शहाजी डोंगरे, आजी-माजी प्राचार्य, रयत सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.