नवी दिल्ली – तत्कालिन कॉंग्रेस सरकारने सन १९७४ साली श्रीलंकेजवळील कच्छईथीवू हे भारताचे बेट श्रीलंकेला दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. त्याचा कॉंग्रेसने जोरदार समाचार घेतला आहे.
काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, पंतप्रधानांनी केलेले विधान हे संदर्भाचे निवडक तुकडे घेऊन केलेले विधान आहे. तामिळनाडुतील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे, जेथे सर्व सर्वेक्षणे दाखवतात की तामिळनाडुत भाजपचा मोठा पराभव होईल.
पंतप्रधानांची अडचण अशी आहे की ते कोणत्याही संदर्भाशिवाय विधाने करतात. जर असा कोणताही करार झाला असेल तर तो काय होता हे आपण समजून घेतले पाहिजे.
दुसरे म्हणजे, पंतप्रधान गेली ९ वर्षे काय करत होते?एवढी गंभीर माहिती मिळाल्याचा त्यांचा दावा असेल तर त्या माहितीवरून इतकी वर्ष ते एवढे शांत का होते? हे प्रचाराचे निवडक तुकडे आहेत, ते खोटे बोलतात.
तमिळनाडूत निवडणुका सुरू आहेत. तमिळनाडूत भाजपचा चांगलाच धुव्वा उडेल त्यांच्या अशा स्वरूपाच्याविधानांमुळे भाजपला तेथे काहीही लाभ होणार नाही. तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के सेल्वापेरुन्थगाई यांनी पंतप्रधान मोदींना असले जुने संदर्भ देऊन आरोप करण्यापेक्षा त्यांच्या सरकारने गेल्या १० वर्षात केलेल्या कामांसंदर्भात श्वेतपत्रिका सादर करण्याचे आव्हान दिले.
असे आरोप करण्यापुर्वी प्रथम मोदींना विचारले पाहिजे की चीनच्या सीमेवर सध्या काय चालले आहे. अरुणाचल प्रदेश, लडाखमध्ये चीनने किती चौरस किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेतले आहे? त्याबद्दल मोदींना श्वेतपत्रिका अहवाल देण्यास सांगा.
दरम्यान, रामेश्वरम (भारत) आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेले हे बेट पारंपारिकपणे श्रीलंका आणि भारतीय मच्छिमार वापरत होते. १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी “भारत-श्रीलंका सागरी करार” अंतर्गत कच्छथीवू हा श्रीलंकेचा प्रदेश म्हणून स्वीकारला.