नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथील अटल टनेल या 9.02 किमीच्या बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. उद्घाटनानंतर रिकाम्या बोगद्यात काहीं हजारो लोकांना अभिवादन करीत आहेत अशा थाटात ते हात हलवत जाताना दिसले होते. यावरून त्यांना सोशल मीडियात जोरदार ट्रोल करण्यात आले. या कृत्यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणे सोडा, आपले मौन तोडा. प्रश्नांना सामोरे जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. यासोबतच राहुल गांधींनी आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
PM जी, अकेले टनल में हाथ हिलाना छोड़ो, अपनी चुप्पी तोड़ो।
सवालों का सामना करो, देश आपसे बहुत कुछ पूछ रहा है। pic.twitter.com/o6pVLjZlIO— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2020
सोशल मीडियात मोदींवर टीका करताना अनेकांच्या कल्पनाशक्तीला मोठाच बहर आलेला दिसला होता. एकाने म्हटले आहे की, समजा मोदी आयपीएल खेळाडू असले असते तर त्यांनी रिकाम्या स्टेडियमकडे पहात हात हलवून उपस्थित नसलेल्या जमावालाही अभिवादन करण्याची हौस भागवून घेतली असती.
दुसऱ्या एका ट्रोलरने म्हटले आहे की या कृत्याबद्दल मोदींना दूषणे देऊ नका, ते या बोगद्यातून भविष्यात जे लोक येजा करणार आहेत त्यांच्यासाठी ते आधीच हात हलवून त्यांना अभिवादन करून ठेवत आहेत, किती दूरदृष्टीचे नेते आहेत ते !.