रावळपिम्डी: पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे. रशीद यांनी मोदींना मुसोलिनी-हिटलर संबोधिले आहे. मोदी म्हणजेच मुसोलिनी हिटलर भारतीय मुस्लिमांसाठी समस्या उभी करत असल्याने दोन्ही देशांदरम्यान युद्धाची शक्यता निर्माण झाल्याचे रशीद यांनी म्हटले आहे.
काश्मीर आणि भारतातील मुस्लिमांच्या पाठिशी उभे राहणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. मोदी सरकारच्या निर्णयांमुळे भारत आणि पाकिस्तानातील मतभेद वाढणार असल्याने युद्धाचा धोका असल्याची मुक्ताफळे रशीद यांनी उधळली आहेत. हे युद्ध केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार नसून पूर्ण उपखंड यात सामील असेल असे त्यांनी म्हटले आहे. कलम 370 हद्दपार करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे आतापर्यंतचे सर्व कट भारताने उधळून लावल्याने पाकिस्तानी नेत्यांना मोदींविषयी गरळ ओकण्याशिवाय गत्यतंरच राहिले नाही, हेच यातून दिसून येत आहे.