नवी दिल्ली : ढासळती अर्थव्यवस्था सावरण्याचे आव्हान आणि रोजगार निर्मितीच्या संधी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या वार्षिक अंदाज पत्रकाच्या पार्श्वभूमीवर देशातील नामवंत उद्योगपतींशी संवाद साधला. सर्वाधिक श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी, टाटा समुहाचे अध्वर्यु रतन टाटा, टेलीकॉम क्षेत्रातील सुनील भारती मित्तल, अब्जाधिश गौतम अदानी, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र, खाणसम्राट अनिल अग्रवाल यांचा यात समावेश होता.
या बैठकीवेळी घेतलेल्या छायाचित्रात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर, टीव्हीएसचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन, एल ऍण्ड टीचे प्रमुख ए. एम. नाईक हेही दिसत आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन या एक फेब्रुवारीला त्यांचा दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आर्थिक विकास दर सर्वात कमी म्हणजे 4.5 टक्क्यांवर आला आहे. विकास दराला चालना देण्यासाठी मोदी सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत. सप्टेंबर 2019मध्ये कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्यात आली. तो 30 टक्क्यांवरीन 22 टक्क्यांवर आणण्यात आला. थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी उत्पादन कंपन्यांचा कर 15 टक्क्यांवर आणला. ही कर कपात अन्य आशियाई देशांना समोर ठेऊन करण्यात आली. या शिवाय सरकारकडून अन्य काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. सरकारकडून 10 सार्वजनिक बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले. वाहन उद्योगाला पाठबळ, पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी योजना, या शिवाय नव्या उद्योगांना करलाभ असे उपाय योजण्यात आले.
मात्र कमकुवत पडलेल्या मागणीला यातील कोणत्याही उपायांनी पुनरूज्जिवित करता आले नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. विना परताव्याची कर्जांच्या ओझ्याखाली काही व्यावसायिक अणि सार्वजनिक बॅंकांचा ताळेबंद झाकोळला गेला आहे. रेपो दरातही रिझर्व्ह बॅंकेने कपात केली.
विकास दरात वाढ करण्यासाठी सुचना मागवण्यासाठी मोदी यांच्या गेल्या दोन आठवड्यातील सुरू असणाऱ्या चर्चांच्या फेऱ्यातील प्रयत्नांचा भाग म्हणून उद्योगपतींना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. यापुर्वी कोटक महिंद्रा बॅंकेचे सीइओ उदय कोटक, स्टेट बॅंक ऍफ इंडियाचे प्रमुख रजनीश कुमार, एचडीएफसी बॅंकेचे आदित्य पुरी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज टिव्ही मोहनदास पै, माजी अर्थसचिव हसमुख अधिया, टेक महिंद्राचे सीइओ सी. पी. गुरनानी आदींशी मोदी यांनी चर्चा केली होती.