नवी दिल्ली – कर्नाटकात बहुतेक भागात गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे पण मोदी सरकारने राज्यातील लोकांना मदत करण्यास नकार दिल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी कम्युनिकेशन जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, “पंतप्रधान आज कर्नाटकातील शिवमोग्गा येथे आहेत. आम्हाला आशा आहे की ते त्यांच्या भाषणात राज्यातील जलसंकटाच्या मुद्द्यांवर लक्ष देतील. कर्नाटक राज्याच्या बहुतांश भागात तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे तीव्र संकट निर्माण झाले आहे.
राज्यातील २३६ पैकी २२३ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. राज्य सरकारने मोदी सरकारला दुष्काळ निवारणासाठी १८ हजार १७२ कोटी रुपयांचा निधी देण्याची विनंती केली आहे. पण त्याला मोदी सरकारने अजिबात प्रतिसाद दिलेला नाही असे रमेश यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील दुष्काळाशी संबंधित ताण कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या १०० वरून १५० पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, असे रमेश म्हणाले.या योजेनेसाठी केंद्राकडून मदत मिळणे अपेक्षित असताना त्यालाही मोदी सरकारने पैसे देण्याचे टाळले आहे असे जयराम रमेश यांचे म्हणणे आहे.
मोदी सरकार कर्नाटकातील मनरेगा कामगारांना त्यांचे वेतन कधी देणार आहे, असा सवाल त्यांनी केला.