नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जी-20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण याच जी 20 परिषदेमुळे काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. 9 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात G-20 डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत ‘ लिहिल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी जाहीर केली असून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतींनी पाठवलेल्या जी-20 डिनरसंदर्भातील निमंत्रण पत्रावर ‘President Of India’ ऐवजी ‘President Of Bharat’ लिहिल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत जो इंडिया आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे.” असे म्हटले आहे.
So the news is indeed true.
Rashtrapati Bhawan has sent out an invite for a G20 dinner on Sept 9th in the name of 'President of Bharat' instead of the usual 'President of India'.
Now, Article 1 in the Constitution can read: “Bharat, that was India, shall be a Union of States.”…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 5, 2023
भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट करत बंगळूरमध्ये 18 आणि 19 जुलैला झालेल्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव जाहीर केले. INDIAN NATIONAL DEMOCRATIC INCLUSIVE ALLIANCE अर्थात I.N.D.I.A. त्यानंतर ‘इंडिया’ हा शब्द चांगलाच चर्चेत आला. सत्ताधारी पक्ष भाजपने या नावावरून अनेकदा विरोधकांवर टीका केली आहे.
देशाचे नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ करण्याच्या हालचाली सुरू असल्याची काँग्रेसला शंका आहे. राष्ट्रपती भवनाकडून ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार याच्याबद्दल तर्कवितर्क सुरू असताना त्यातली एक शक्यता या नामबदलाची पण आहे का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.