दाहोद – पंतप्रधान मोदींच्या राजवटीत देशातील काही मोजक्याच लोकांच्या हातात सारी संपत्ती एकवटत असून भारताची आता गरिबांचा भारत आणि श्रीमंतांचा भारत अशी विभागणी झालेली दिसत आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. गुजरातच्या आदिवासी पट्ट्यात दाहोद येथे आदिवासी सत्याग्रह सभा आयोजित करून त्यांनी कॉंग्रेसच्या येथील निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. गुजरातमध्ये यावेळी कॉंग्रेस सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.
ते म्हणाले की, कॉंग्रेसला असा विषमतेवर आधारित देश नको आहे. आम्ही ही विषमतेची दरी मोडून काढू. आमच्या राज्यात प्रत्येकाला समान न्याय आणि समान अधिकार असतील, असे ते म्हणाले. गुजरातमधील वन, पाणी आणि जमिनीवर येथील लोकांचा हक्क आहे पण मोदी ही संपत्ती काही मोजक्याच श्रीमंतांना देण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या गुजरातमधील राजवटीने आदिवासींचे हक्क हिरावले आहेत, असे ते म्हणाले. येथील आदिवासींनी उद्देशून ते म्हणाले की, मोदी तुम्हाला येथे काहीही देणार नाहीत.
उलट जे तुमचे आहे ते तुमच्याकडून हिसकावून घेऊन श्रीमंतांच्या हवाली केले जात आहे. येथील आदिवासी कष्टाळू आहेत. त्यांनी देशाच्या संपत्तीत आपल्या श्रमाने भरच घातली आहे पण त्याच्या बदल्यात त्यांना काहीही मिळालेले नाही. करोनाच्या स्थितीच्या हाताळणीवरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, गंगा नदीच्या पात्रात करोना काळात दुथडी भरून प्रेते वाहिली. देशात 50 ते 60 लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. पण त्यांनी केवळ टाळ्या आणि थाळ्या वाजवून करोनाला घालवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. करोना काळात तुम्हाला औषधे मिळाली नाहीत, तुम्हाला ऑक्सिजन मिळाला नाही, रुग्णालयात खाटा मिळाल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी तुम्हाला थाळ्या वाजवायला सांगितल्या, असे ते म्हणाले.
देशातील प्रसारमाध्यमे 24 तास लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करीत आहेत. या माध्यमांतून तुम्हाला सतत मोदी दिसतात किंवा ऍक्टर लोकांच्या स्टोऱ्या दाखवल्या जातात; पण लोकांचे प्रश्न मात्र त्यात दाखवले जात नाही. मोदींच्या कथिक गुजरात मॉडेलवरही त्यांनी सडकून टीका केली. या मॉडेलमध्ये लोकांना रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळाल्या नाहीत, आता नवीन गुजरात निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
गुजरातमध्ये आम्ही सहकाराचे मॉडेल पुन्हा प्रस्थापित करू आणि अमुल सारखे मॉडेल येथे पुन्हा उभे करून लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे देऊ, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर पार-तापी नदी जोड प्रकल्प त्वरित रद्द केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. या निमित्ताने आम्ही आदिवासींच्या मालकीच्या जंगल आणि जमिनीमध्ये उद्योगपतींची घुसखोरी होऊ देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
कॉंग्रेसने ग्रामीण रोजगारासाठी सुरू केलेल्या मनरेगा योजनेचे समर्थन करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींनी संसदेत मनेरगा योजनेची थट्टा केली होती. पण करोनाच्या काळात याच योजनेमुळे ग्रामीण भागात लोकांना रोजगाराची संधी मिळू शकली होती. जर मनरेगा योजनाच अस्तित्वात नसती तर भाजप या लोकांना कोठून रोजगार देणार होते, असा सवालही त्यांनी केला. ज्या योजनेला भाजपने विरोध केला आज त्यांनाच ही योजना राबवावी लागत आहे, असेही ते म्हणाले.