उज्जैन – मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील दंगवाडा गावात लग्नादरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या विवाह सुरु असताना अचानक वीज गेल्याने नवरदेव नवरींची अदलाबदल झाली. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दंगवाडा गावातील रहिवासी रमेशलाल यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा विवाह एकाच मांडवात सुरु होता. यापैकी निकिता आणि करिश्मा या दोन मुलींचा विवाह दंतेवाड्यातील रामेश्वर आणि गणेश या दोन मुलांशी ठरला होता. दोघेही नवरदेव वेगवेगळ्या कुटुंबातले आहेत. रामेश्वरचं लग्न करिश्मासोबत तर गणेशचं लग्न निकितासोबत ठरलं होतं.
या लग्न सोहळ्यासाठी विविध ठिकाणांहून त्यांचे नातेवाईक आले होते. लग्नाचा विधी सुरु असताना नेमकी सप्तपदीच्या वेळी त्या परिसरातील वीज गेली. अंधारामुळे गोंधळ झाला आणि गोंधळात वधूंची अदलाबदल झाली. दोन्हीही वधूंनी डोक्यावरुन पदर घेतला होता. अंधारात नवरदेवांना त्यांना ओळखणे कठिण झाले. अशात निकिताने रामेश्वरबरोबर तर करिश्माने गणेशबरोबर सप्तपदी घेतली.
अंधारातच लग्नाच्या विधी पार पडला. नवरदेवांनी वेगवेगळ्या वधूंचा हात धरून पूजा केली. पण रात्री वीज आली तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. घडलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. वीज आली त्यावेळी निकिताच्या हातात रामेश्वरच्या आणि करिश्माच्या हातात गणेशचा हात होता. दरम्यान, या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात वादही निर्माण झाला. मात्र मध्यस्थिंच्या मदतीने वाद सोडवण्यात आला. पुन्हा त्यांचा विधि करण्यात आला. मुलींचं लग्न ठरलेल्या मुलाशी लावून देण्यात आलं.