गुवाहाटी : सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधात (का) झालेल्या हिंसक आंदोलनामुळे आसाममध्ये बंद केलेली इंटरनेट सेवा शुक्रवारी पुन्हा सुरळीत करण्यात आली. एअरटेल या कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरसेवेवरील बंदी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उठवण्यात आली. नव्या निर्बंधाबाबत कोणतीही सूचाना सरकारकडून आली नाही.
दरम्यान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, आसामी नागरिकांची भाषा आणि ओळख यांना कोणताही धोका नाही. आसामच्या भूमीपुत्राचे हक्क कोणीही हिरावू शकत नाही. आपली भाषा आणि ओळख यांना कोणताही धोका नाही, याची हमी मी देऊ इच्छितो.
का कायद्याविरोधात उफाळलेल्या हिंसाचारामुळे 11 डिसेंबरपासून इंटरनेट सेवा संपूर्ण राज्यात खंडित करण्यात आली होती. का विरोधातील निदर्शने गुरूवारीही सुरू होती. मात्र उच्च न्यायलयाने इंटरनेट आणि मोबाईल सेवेवरील निर्बंध उठवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही सेवा पूर्ववत करण्यात आली. न्या. मनोजित भूयान आणि न्या. सौमित्र सैका यांनी मोबाईल आणि इंटरनेट सेवेवरील निर्बंध उठवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आणि स्फोटक मजकुरावर ते बंदी आणू शकतात, असे या खंडपीठाने स्पष्ट केले.