मुंबई – देशाच्या जडणघडणीत अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठ योगदान आहे. आज त्यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहताना मोदी सरकारला टोला लगावला आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ ट्वीट करताना मनसेने म्हटले की, सत्ताधीश कुणीही असो, पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही, पण ही अटलवाणी ऐकलीत तर कळेल की, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेले नव्हते, पण आज?
असा प्रश्न उपस्थित करत मनसेने म्हटले की, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना की पुन्हा या देशात विचारांचे, विवेकाचे, तात्विक विरोधाचे राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो!, असे वक्तव्य करत मनसेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
संसद भवनातील व्हिडीओमध्ये अटलबिहारी वाजपेयी बोलताना दिसतात की, सरकार येईल, जाईल आणि पक्ष बनतील, बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे. या देशातील लोकशाही राहिली पाहिजे. तत्कालीन पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षातील नेते असतानाही अटबिहारी वाजपेयी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून जेनिव्हा येथे पाठवण्यात आले होते.
त्यावेळी, पाकिस्तानी आश्चर्यचकीत झाले होते, अशी आठवण वाजपेयी सांगताना दिसत आहेत. देशात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा दुवा कायम राहिला पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी बोलताना दिसत आहेत. हा मुद्दा धरून मनसेने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.