औरंगाबाद – राजकारणात आता जी परिस्थिती आहे ती पाहुन मला राजकारणात यायची इच्छाच झाली नसती. राज ठाकरे यांनी मी मुलगा आहे म्हणून मला संधी दिली. त्यांचा मुलगा आहे म्हणून राजकारणात आलो अशी प्रांजळ प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे.
अमित ठाकरे गेल्या काही काळापासून पक्षबांधणीसाठी राज्याचा दौरा करत आहेत. मध्यंतरी गणपती आणि नवरात्र महोत्सव निमित्ताने दौरे थांबले होते. मात्र त्यांनी आता पुन्हा मराठवाड्यातून दौऱ्यांना सुरूवात केली आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित यांना पत्रकारांनी पुन्हा एकदा मुंबईतील दसरा मेळाव्याबाबत आणि ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारले असता शिवसेनेतील सध्याच्या घडामोडी पाहुन बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी वाईट वाटते व ठाकऱ्यांनी का एकत्र यावे असा सवाल त्यांनी केला. तसेच आपण निवडणुकीला उभे राहण्याचे संकेतही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
अंधेरी पोटनिवडणुकीत ठरतोय ‘हा’ कळीचा मुद्दा; ठाकरे गटाला काॅंग्रेसचा हातभार मिळणार का?
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र उध्दव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे राजकारणात सक्रिय आहेत. त्यानंतर ठाकरे घराण्याची तिसरी पीढी म्हणजे आदित्य आणि आता अमितही राजकारणात उतरले आहेत. आदित्य यांनी तर मंत्रिपदही भूषवले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी राज्यभर दौरे काढले व त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. आता अमित ठाकरे यांच्याबद्दलही व विशेषत: त्यांचे व्यक्तीमत्व पाहुन तरूणांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण दिसते आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात कितीही पडझड झाली तरी ठाकरे हा जो ब्रॅंड आहे त्याचे मूल्य तसूभरही कमी झाले नसल्याचे स्पष्ट होते आहे. ही त्यातल्या त्यात या घराण्याला मानणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणात ठाकरे पाहिजेतच असे म्हणणाऱ्या मराठी माणसासाठी जमेची बाजू आहे. मध्यंतरी एका संकेस्थळाने राजकारणातील लोकांच्या व्यक्तीमत्वाच्या अनुशंगाने सर्व्हे केला होता. त्यात राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि अमित ठाकरे यांना पसंती दर्शवण्यात आली होती.