सिरमौर – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला. यावेळी कॉंग्रेस पक्षावर त्यांनी जोरदार टीका केली. आग लावल्याशिवाय या पक्षाला चैन पडत नाही. त्यांचे कामच भांडणे लावण्याचे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ विकासाचे काम करतात असा दावा त्यांनी केला.
हिमाचल्या सिरमौर जिल्ह्यात त्यांनी आज भाजपच्या प्रचाराला सुरुवात केली. पहिले वीरचक्र या राज्याच्या मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाले. ही वीरभूमी आहे. त्यामुळे पंतप्रधानांना हिमाचल प्रदेश आपला वाटतो. जयराम ठाकूर कोणत्याही कामात राज्याला मागे राहू देणार नाहीत. येथील हाटी समुदाय गेल्या 55 वर्षांपासून संघर्ष करत होता.
कोणतेच सरकार त्यांचा आवाज ऐकत नव्हते. मोदींनी एका क्षणात त्यांचा प्रश्न संपवला आणि त्यामुळेच आता शिक्षण असो, राजकीय आरक्षण असो किंवा नोकरीचे आरक्षण असो ते आता हाटी समुदायाला मिळणार आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे कॉंग्रेस अस्वस्थ आहे. त्यांना आग लावल्याशिवाय करमत नाही. आता हाटींना आदिवासी दर्जा दिला जाणार असल्यामुळे कॉंग्रेस दलित आणि अनूसूचित जमातीतील आपल्या बांधवांना चिथावणी देतील. तुमचे आरक्षण गेले असल्याची भीती त्यांनी घालतील. मात्र, कोणीही घाबरण्याचे कारण नाही.
मी स्वत: दलित बांधवांना लिहून देतो की त्यांचे कोणतेही अधिकार जाणार नाहीत. मोदी केवळ विकासाचे काम करतात. कॉंग्रेस भांडणे लावण्याचे काम करते. कोणाचेही काहीही हिरावून घेतले जाणार नसून हिमाचल प्रदेशात आता नवा पायंडा पडणार आहे. एक बार भाजपा बार बार भाजपा हा तो पायंडा असेल. शेजारच्या उत्तराखंड राज्यातही तेच झाले याकडे शहा यांनी लक्ष वेधले.