औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गन्हा दाखल करण्यात आला आहे. 153, 116, 113, 135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह राजीव जवळेकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी 16 अटी घालून दिल्या होत्या त्यापैकी 12 अटींचे त्यांच्या भाषणात उल्लंघन झाले असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारकडून अघोषित आणीबाणी सुरु आहे. राज ठाकरे हे स्वयंभू नेतृत्व आहेत. राज्य सरकार अहंकाराने भरलंय, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करणं ही अतिरेकी कारवाई आहे. राज्य सरकारकडून दहशतीसारखं वातावरण निर्माण करण्यात येतंय, राज ठाकरेंना प्रतिसाद मिळत असल्यानेच ही कारवाई करण्यात आली असल्याचे दरेकर यांनी म्हंटले आहे.