आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्रांना खोचक आवाहन
मुंबई – मुंबई, ठाणे, कल्याण तसेच अन्य उपनगरांमधील रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून या ठिकाणी दौरा करावा म्हणजे किमान रस्ते तरी ठिक होतील, असे खोचक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री राहतात त्या भागापासून संपूर्ण मुंबई, ठाणे, कल्याण तसेच अन्य उपनगरांमध्ये फिरून आढावा घ्या. महापालिकेचे दावे कीती फोल आहेत ते सहज लक्षात येइल. जेव्हा मोठ्या नेत्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे दौरे ठरतात त्यावेळी स्थानिक महापालिका रस्ते दुरूस्त करते. मात्र, यंदा रस्त्यांची कामे अत्यंत योग्य पद्धतीने करण्यात आली असल्याचे दावे अनेक शहरांतील महापालिकांनी केले होते. मुख्यमंत्र्यांनी या शहरांमध्ये दौरा केला तर हे दावे कीती फोल आहेत ते लक्षात येइल, असेही पाटील यांनी नमुद केले आहे.
रस्त्यात खड्डे आहेत की खड्यांमध्ये रस्ते हेच कळत नाही. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यावर लगेचच रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली. अशीच जर कामसू वृत्ती असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्व राज्यात दौरे करावेत किमान रस्ते तरी ठिक होतील, अशी खोचक टिपणीही पाटील यांनी केली.
ठाणे, कल्याण, तसेच शिळ फाटा तसेच अन्य उपनगरांतील रस्त्यांच्या अवस्थेवर टीका सुरु झाल्यानंतर लगेचच त्याची दुरूस्ती हाती घेण्यात आली मात्र, त्याचा दर्जा पाहिला तर पुढील एका पावसातच हे रस्ते वाहून जातील. या रस्त्यांच्या दुरूस्तीचे कंत्राट ज्या ठेकेदारांना दिले जाते त्यांच्या कामाच्या दर्जाबाबतही आता प्रश्न निर्माण होत आहे. महापालिका याबाबत गंभीर नसल्याने यात सरकारनेच आता लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.