पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लळा आहे असे सांगता, तर मग औरंगजेबाचे उदात्तीकरण का करता? सभागृहात औरंगजेबासाठी का भांडता असा संतप्त सवाल आमदार महेश लांडगे यांनी सपाचे आमदार अबु आझमी यांना विचारला. महाराष्ट्र विधानभवनात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार महेश लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या वेळी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्नही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार लांडगे यांनी विचारला.
विधानभवनात बुधवारी (दि. 2) सुरू असलेले पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कारवाई करण्याबाबत गदारोळ झाला. या वेळी सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक खडाजंगी पहायला मिळाली. या वेळी आमदार महेश लांडगे यांच्या भाषणावेळी गदारोळ करणाऱ्या आमदार अबू आझमींवर लांडगे चांगलेच संतापले.
या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, विधानभवनात उपस्थित असणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. शिवाजी महाराजांविषयी आस्था नाही, असा एकही आमदार सापडणार नाही. मात्र तरीही त्यांना त्रास देणाऱ्या, धर्माविरोधात काम करणाऱ्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करत त्यासाठी काही लोकप्रतिनिधी का भांडत आहेत. त्यांचा औरंगजेबाशी काय संबंध आहे. जाती-जातींमध्ये भांडणे लावणाऱ्या, महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई करणार का, असा संतप्त प्रश्न आमदार लांडगे यांनी आमदार अबू आझमी यांना विचारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशा लोकांवर कारवाई करणार का असा प्रश्न विचारला.
या वेळी उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेब या देशात शासक होता, मात्र तो आमचा कधीच हिरो होऊ शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले. त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही.