शिर्डी – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर सगळेच मोठे झाले आहेत. मात्र, आज मोठे झाल्यानंतर त्यांना बाकीच्यांची आठवण येत नाही. परंतु असे केल्याने शिवसेना पक्ष छोटा होत नाही. सत्ता त्यांची आहे त्यामुळे त्यांना जसं वागायचं तसं ते वागतात, असे मत माजी परिवहनमंत्री आ. अनिल परब यांनी व्यक्त केले.
आ. परब यांनी आज (गुरुवार) शिर्डी येथे साईदर्शन घेतले. या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्राचे अनावरण, तसेच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचा प्रारंभ व लोकार्पण आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवाराला निमंत्रण नाही. याबाबत छेडले असता आ. परब म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर मोठे झालेल्यांना आता बाकीच्यांची आठवण येत नसेल, परंतु असे केल्यामुळे शिवसेना पक्ष काय छोटा होत नाही. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यापूर्वी कुठल्याही घटनात्मक पदावर नसतानासुद्धा त्यांना सन्मानाने बोलावलं जायचं.
सरकारच्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख पाहुणे असायचे. आता ते माजी मुख्यमंत्री व आमदार आहेत. तरीदेखील एखाद्या सामान्य आमदारासारखी त्यांना वागणूक दिली जाते, ही त्यांचा अपमान करणारी गोष्ट आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते असं वाटतंय का, या प्रश्नावर ते म्हणाले की, एखाद्या निवडणुकीत थोडीशी गणिते इकडे-तिकडे झाली म्हणजे कुठल्या आघाडीत बिघाडी होत नाही.
हे सगळीकडे चालत असते. किरीट सोमय्या नेहमीच सांगतात की, माझ्याकडे हे पुरावे आहेत, याबाबत छेडले असता परब म्हणाले की, सोमय्या हे काय महान मोठा महात्मा नाही, की ज्याच्याकडे सगळं आहे. त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाहीत. दि. 23 रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत विचारले असता, बाबांचा मी भक्त असून, बाबांवर माझा विश्वास आहे. माझ्यावर गेले दीड-दोन वर्षांपासून आरोप करताहेत. चौकशी सुरू आहे. अजूनपर्यंत त्याच्यात कुठेही काहीही प्रगती नाही.
आ. पडळकर व आ. खोत मूग गिळून गप्प
एसटी कामगारांच्या थकीत पगाराच्या प्रश्नावर विचारले असता म्हणाले की, मी परिवहनमंत्री असताना भाजपचे आ. गोपीचंद पडळकर व आ. सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे यासाठी पाच महिने आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरले होते. परंतु सध्या परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही. आ. पडळकर व आ. खोत मूग गिळून गप्प आहेत. त्यांचे आंदोलन म्हणजे केवळ स्टंट होता. तो आता उघडकीस आला आहे.