लंडन – भारताच्या महिला क्रिकेट संघाची मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार मिताली राजने अनोखी कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे. तिने हिटमॅन रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या कामगिरीला मागे टाकत कारकिर्दीत 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
भारतीय पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट संघही सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर एकदिवसीय सामन्यांची मालिकाही भारताने गमावली आहे. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारत पराभूत झाला आहे. दरम्यान, दोन्ही सामन्यांत कर्णधार मिताली राजने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम साकार केला आहे. तिने रोहित व कोहलीसह अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.
मितालीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 72 आणि दुसऱ्या सामन्यात 59 धावा केल्या. या दोन अर्धशतकांमुळे मितालीच्या नावावर इंग्लंडच्या भूमीत 14 पेक्षा जास्त वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम जमा झाला आहे. तिने इंग्लंडमध्ये 40 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 2 शतके आणि 12 अर्धशतके फटकावली आहेत.
रोहितने इंग्लंडमध्ये केवळ 24 सामन्यांत 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात 7 शतकांसह 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 7 शतकांतील 5 शतके त्याने 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत फटकावली आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या राहुल द्रविडने 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात 2 शतकांचा आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने इंग्लंडमध्ये 31 सामन्यांत 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात केवळ 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. शिखर धवनने इंग्लंडमध्ये 19 सामन्यांत 8 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.