मुंबई – जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे ते प्रमाण लक्षात घेतले तर सन 2050 पर्यंत मुंबईतल्या नरिमन पॉईन्ट परिसरातील बराचसा भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार आहे. त्यात मंत्रालयाच्या परिसराचाही समावेश असणार आहे, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे, अशी माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
आज मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लान आणि त्याच्या वेबसाईटचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त बोलत होते. ते म्हणाले की, एका अनुमानानुसार दक्षिण मुंबईतील ए, बी, सी, आणि डी वॉर्ड पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत. निसर्गाने आपल्याला इशारा दिला आहे.
आता जर आपण जागे झालो नाही तर मोठा धोका उद्भवू शकतो. त्यांनी सांगितले की, कफ परेड, नरिमन पॉईन्ट आणि मंत्रालय या भागापैकी 80 टक्के भाग समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. 2050 हा काही लांबचा काळ नाही. 25 ते 30 वर्षात नरिमन पॉईन्टचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाणार आहे असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर मुंबईने ऍक्शन प्लान तयार केला आहे. अशा स्वरूपाचा ऍक्शन प्लान तयार करणारे मुंबई हे दक्षिण अशियातील पहिले शहर आहे. चहल म्हणाले की, यापूर्वी आपण केवळ तापमान वाढ या बाबत ऐकत होतो. तापमान वाढीने मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळणार असल्याच्या बाबी आपण ऐकल्या. पण त्याचा आपला थेट तोटा नसल्याने त्याविषयी आपण बेफिकीर राहिलो; पण आता मात्र हा धोका आपल्या दरवाजा पर्यंत आला आहे. त्यातून भावी पिढीच नव्हे तर सध्याची पिढीही धोक्यात येणार आहे.
चहल यांनी या धोक्याची यावेळी तपशीलाने माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या 129 वर्षात पहिल्यांदाच आपण निसर्ग चक्रीवादळासारखा धोका अनुभवला. त्यानंतर गेल्या पंधरा महिन्यात आपण मुंबईतच तीन चक्रीवादळे अनुभवली.5 ऑगस्ट रोजी नरीमन पॉईन्ट परिसरात साडे पाच फूट समुद्राचे पाणी साठले होते.
महाराष्ट्रात मान्सुन 6 किंवा 7 जूनला आला पण त्याच्या आधीच 17 मे रोजी तौक्ते वादळ आले आणि त्यातून मुंबईत तब्बल 214 मिमी इतका पाऊस पडला. मुंबईत जितका पाऊस पडतो त्याच्या 70 टक्के पाऊस 17 ते 20 जुलैला पडला.गेल्या चार वर्षांचा अभ्यास केला तर दरवर्षी मुंबईतील पावसाचे प्रमाण वाढतच चालले आहे. हा धोक्याचा इशारा आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने पर्यावरणाचा एक ऍक्शन प्लान तयार केला आहे असे चहल म्हणाले.