नवी दिल्ली – दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री आणि आपचे ज्येष्ठ नेते राजकुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा (Minister Rajkumar Anand resigns) दिला आहे. राजकुमार आनंद हे केजरीवाल सरकारमध्ये समाजकल्याण मंत्रालय सांभाळत होते.
राजकुमार आनंद म्हणाले, आपमध्ये दलित आमदार किंवा नगरसेवकांचा आदर राखला जात नाही. दलितांना महत्त्वाच्या पदांवर स्थान दिले जात नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वांवर चालणारा व्यक्ती आहे, जर मला दलितांसाठी काम करता येत नसेल तर पक्षात राहण्यात काही अर्थ नाही.
तसेच दिल्ली सरकारमध्ये मी मंत्री असून माझ्याकडे सात विभाग आहेत. मी राजकारणात आलो तेव्हा अरविंद केजरीवाल म्हणाले होते की राजकारण बदलले तर देश बदलेल. पण आज खेदाने म्हणावे लागते की राजकारण बदलले नाही, तर राजकारणी बदलले आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणे माझ्यासाठी अस्वस्थ झाले आहे, असा खुलासाही त्यांनी केला.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केजरीवाल सरकारचे मंत्री राजकुमार आनंद यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले होते. त्यादरम्यान राजकुमार आनंद यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी आल्याचे सांगितले होते.
आप पक्ष फोडण्याचा हेतू
आम आदमी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागे आप पक्ष फोडण्याचा हेतू असल्याचे आम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगत आहे. तसेच यात भ्रष्टाचार उघड करण्याचा हेतू नसून पक्ष फोडणे हा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे भाजप हा या देशात गुंडगिरी करणारा गुन्हेगारांचा पक्ष आहे, हे आम्ही पुन्हा-पुन्हा सांगत आहे.
ईडी, सीबीआय वापरा आणि पक्ष फोडा, सरकार फोडा हेच मोदी सरकारचे धोरण असून इतर राज्यातही त्यांनी असेच केले आहे. सध्या आपच्या प्रत्येक मंत्री आणि आमदाराची कसोटी आहे, हेही लक्षात घ्यायला हवे, असा खुलासा करण्यात आला.