औरंगाबाद – आम्ही भाजपची बी टीम नाही. भाजपला रोखण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत असे एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटल आहे की, सध्याची महाविकास आघाडी तीन चाकी ऑटोरिक्षा आहे. त्याऐवीज आपण एकत्र येऊन एक “आरामदायी कार” बनवू शकतो. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आमची त्यांच्याबरोबर आघाडी करण्याची तयारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेने मात्र हा प्रस्ताव साफ फेटाळला आहे. ज्यांना वंदे मातरम म्हणण्यात अडचण आहे त्यांच्याशी कोणतीही युती होणार नाही असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेना नेते आणि आमदार अंबादास दानवे म्हणाले की, ‘वंदे मातरम’ गीताला विरोध करणाऱ्या आणि “रझाकारांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या” पक्षाशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जलील यांचा पक्ष रझाकारांच्या धोरण व तत्त्वांवर चालतो असेही त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जलील यांच्या म्हणण्याला फार महत्व देण्याचे टाळले. ते म्हणाले की, एआयएमआयएमने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत हातमिळवणी करणे हे भाजपसाठी महत्त्वाचं नाही.
जलील यांनी शुक्रवारी म्हटले होते की एआयएमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम नाही आणि ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत युती करण्यास इच्छुक आहेत. राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी शुक्रवारी जलील यांच्या निवासस्थानी भेट दिली तेव्हा त्यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनशी आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली होती असे जलील यांचे म्हणणे आहे.
भाजपला एकहाती पराभूत करण्याची शिवसेनेत ताकद उरलेली नाही. त्यामुळे त्यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज आहे. मी सुचवतो की तीन पक्षांच्या ऑटोरिक्षाला आणखी एक चाक जोडू या. आरामदायी कार तयार करू आम्ही त्यासाठी तयार आहोत असेही खासदार जलील यांनी म्हटले आहे.