मुंबई – असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष आणि भाजप हे दोन पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आरोप कॉंग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांनी केला आहे. काल ओवैसी यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली होती त्याला प्रत्त्युत्तर देताना नसीम खान यांनी वरील टीका केली.
राज्यात मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण मिळाले नाही म्हणून ओवैसी ओरड करतात पण भाजपशासित राज्यांमध्ये असे आरक्षण नाही त्यावर मात्र ते मूग गिळून गप्प बसतात असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात मुस्लिमांसाठी पाच टक्के आरक्षणाची सोय कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने केली होती. तो निर्णय मुंबई उच्च न्यायालयानेही वैध ठरवला होता. पण फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही असा आरोपही त्यांनी केला.
त्याबद्दल आम्ही जेव्हा फडणवीस सरकारच्या विरोधात आवाज उठवत होतो त्यावेळी ओवैसी मात्र शांत होते असा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र विधानसभेत त्यावेळी आम्ही मुस्लिम आरक्षणाचा विषय उपस्थित केला त्यावेळी एमआयएम पक्षाचे आमदार मात्र गप्प होते असेही ते म्हणाले.
त्या उलट एमआयएम पक्षाच्या आमदारांनी फडणवीस सरकारचीच पाठराखण केल्याचा दावाही त्यांनी केला. मुस्लिमांनी ओवैसींचा खरा चेहरा ओळखला आहे ते त्यांना जागा दाखवतील असा विश्वासही खान यांनी व्यक्त केला आहे.