नवी दिल्ली – भारतात मागील 17 वर्षांमध्ये (2001 ते 2018 पर्यंत) 16 लाख हेक्टरपेक्षा अधिक जंगल नष्ट झाले आहे. जंगलाचे प्रमाण घटल्याने वातावरणात सुमारे 172 लाख टन कर्बवायूचे उत्सर्जन झाले आहे. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिटयूट (डब्ल्यूआरआय) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार या कालावधीत वनाच्छादित भूभागाचे एकूण नुकसान गोवा राज्याच्या भौगोलिक आकारापेक्षा 4 पटीने अधिक आहे.
एकूण वृक्षावरणाच्या नुकसानीचा निम्मा हिस्सा ईशान्येतील राज्ये नागालॅंड, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि मणिपूर येथील आहे. 2000 मध्ये वन आवरण भारताच्या भौगोलिक क्षेत्राच्या 12 टक्के होते. 2010 मध्ये हे प्रमाण कमी होत 8.9 टक्क्यांवर आले आहे.
ईशान्येतील राज्यांमध्ये नुकसानीच्या मुख्य कारणांमध्ये हवामान असून त्याच्यामुळे थेट जंगलाच्या गुणवत्तेवर प्रभाव पडत आहे. 2015 ते 2017 या कालावधीत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी सर्वाधिक जंगले गमाविली आहेत. तेथील विकासामुळे जंगलांवर परिणाम होत असल्याचे मानले जात आहे.