जामखेड – गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जामखेड शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने जावईशोध लावत मातीमिश्रित मुरुमाने खड्डे बुजवण्याचा प्रताप केला. त्यानंतर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी इशारा देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागला शहरातील खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यासाठी मुहूर्त मिळेनासा झाला आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.
शहरातून जाणाऱ्या नगर – बीड – खर्डा – करमाळा – महामार्गावर जागोजागी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भातील 6 नोहेंबरच्या दैनिक “प्रभात’मध्ये जामखेड शहरातील रस्ते उठले वाहनधारकांच्या जीवावर या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर रोड, बीड रोड, खर्डा रोड रस्त्यावरील खड्डे बुजावण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, त्यासाठी मातीमिश्रित मुरुमाचा वापर केला जात असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत झाला. परतीच्या पावसानंतर जामखेड शहरातील सर्वच प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची स्थिती बकाल झाली आहे.
खर्डा रोड, बीड रोड, नगर रस्त्यांना खड्ड्यांचे साम्रज्य निर्माण झाले आहे.
शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोजता येणार नाहीत इतके चार ते पाच फूट लांब व सव्वा फुटापर्यंत खोलीचे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी झाली आहेत. या खड्ड्यातून वाहन चालविताना वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात घडत होते. याशिवाय खड्ड्यात वाहने आदळून अनेकांना पाठ, मणक्याचे आजार जडले. त्यातच काही रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली. याबाबत खड्ड्यांबाबत नागरिकांतून तक्रारी वाढल्या होत्या. याच मार्गावर सर्व प्रमुख शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय असल्यामुळे प्रचंड वर्दळीचे हे मार्ग आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी सातत्याने होत होती, निवेदने देण्यात येत होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरील खड्डे मुरुमाने न बुजवता डांबरीकरणाने बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी मुहूर्त मिळेल हे पाहणे औसुक्यचे राहील.