पुणे – “मध्यमवर्गीय नागरिक राजकारणाला केवळ शिव्या घालतात. त्यांपासून आपण दूरच बरे, असा अविर्भाव आणतात. मात्र, तुमचे सगळे आयुष्य हे राजकारणाशी बांधले गेले आहे. बदल घडवायचा असेल तर मध्यमवर्गीय नागरिकांनी अगदी निवडणूक लढवण्याची गरज नसली, तरी त्यांनी राजकारणाकडे लक्ष द्यायला हवे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
“इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस’, पुणे सेंटरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 50 वर्षांपेक्षा जास्त काळ आर्किटेक्चर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विकास भंडारी, विश्वास कुलकर्णी आणि शोभा भोपटकर यांचा आयआयए एस. के. बेलवलकर “ऍवार्ड फॉर एक्सलन्स इन प्रोफेशन’ पुरस्काराने राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट, संदीप बावडेकर, पुणे सेंटरचे अध्यक्ष विकास अचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल आदी उपस्थित होते. याबरोबरच 22 आर्किटेक्चर महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षकांना आयआयएएस. जे. कॉन्ट्रॅक्टस् ऍवार्ड फॉर एक्सलंस इन टीचिंग पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.