मुंबई: मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीवर सध्या वाद सुरू आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोड केली जाऊ नये असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो प्रशासनाला दिले आहेत. हा वाद सुरू असताना बच्चन यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या ट्विटमध्ये बच्चन यांनी मेट्रोचे फायदे सांगितले आहेत. “माझ्या एका मित्राला तातडीने वैद्यकीय मदत हवी होती. मात्र गाडीने जाण्याऐवजी त्याने मेट्रोचा पर्याय निवडला. तो मेट्रोच्या सेवेपासून खूपच खूश होता. त्याने मला असे सांगितले की मेट्रो ही अत्यंत जलद, अधिक कार्यक्षम आणि सुलभ आहे. प्रदूषणावर मेट्रोचा पर्याय चांगला आहे. “असे ट्विट बच्चन यांनी केले होते. तर, दुसरीकडे जास्तीत जास्त झाड लावण्याचा संदेशही त्यांनी दिला आहे. “मी माझ्या बागेत अनेक झाडं लावली आहेत. तुम्ही झाडं लावलीत का?’, असा सवालही त्यांनी केला आहे. केवळ झाडे लावा असं म्हणून प्रत्यक्षात काहीच न करणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला आहे.