नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर अनेकदा पक्षपातीपणाचा आरोप झाला आहे. आता पुन्हा एकदा कॉंग्रेसने फेसबुक इंडियावर बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकने माजी लोकसभा अध्यक्षा आणि कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मीरा कुमार यांचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक केलं आहे. यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
सुरजेवाला म्हणाले, फेसबुक इंडियाच्या प्रमुखांनी मोदी सरकारच्या अजेंड्यासाठी कशी तडजोड केली हे आम्ही पाहिलं आहे. आता माजी लोकसभा अध्यक्ष आणि कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या मीरा कुमार यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं. यातून विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी खालच्या स्तरातील रणनीतीचा उपयोग केला जात असल्याचं सिद्ध होत आहे.
या मुद्द्यावर स्वतः मीरा कुमार यांनी देखील ट्विट केलं आहे. मीरा कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये फेसबुक पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात मीरा कुमार यांच्या फेसबुक पेजवर आमच्या कम्युनिटी स्टॅंडर्डचं उल्लंघन झाल्याचं आणि हे पेज अप्रकाशित केल्याचं सांगण्यात आलं आहे.
मीरा कुमार बिहारच्या राजकारणातील प्रभावी व्यक्ती आहेत. त्यामुळे या काळात त्यांच्या पेजवरील या कारवाईला त्यांनी तीव्र आक्षेप घेत मुद्दा बनवलं आहे. मीरा कुमार म्हणाल्या, फेसबुक पेज ब्लॉक करण्यात आलंय. मात्र असं का? हा लोकशाहीवरील मोठा हल्ला आहे. बिहार निवडणुकीआधी माझं फेसबुक पेज ब्लॉक करणं हा फक्त एक योगायोग नाही.
दरम्यान, दिल्ली सरकारने दिल्ली दंगलप्रकरणी शांती आणि बंधुत्व समितीची स्थापना केली आहे.
या समितीने या प्रकरणी फेसबुकला समन्स करुन चौकशीसाठी बोलावलं. मात्र, फेसबुकने याला न्यायालयात आव्हान देत उपस्थित राहण्यास नकार दिलाय. न्यायालयाने देखील त्यांना तशी सवलत दिली आहे. केंद्र सरकारने देखील या आदेशाला विरोध केला होता.समितीच्या नोटीसविरोधात फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष अजीत मोहन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.