कोल्हापूर- नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
केसरकर म्हणाले, राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत देखील केसरकर यांनी भाष्य केले.
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे असं केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं.
आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही देखील यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.