नवी दिल्ली – कोविड-19 विषयक मंत्रिगटाची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीच्या सुरवातीला डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड विरोधातील लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सर्व कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी या सर्वांच्या सेवाकार्याला सलाम केला.
आतापर्यंत देशात कोविडचे 62 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले असून आज जगात भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक म्हणजे 86 टक्के इतका आहे. मृत्यूदरही 1.53 टक्के म्हणजे जगात सर्वात कमी इतका आहे. सुरुवातीला भारतात रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवस इतका होता. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा कालावधी आता 75 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
सध्या देशभरात कोविड चाचणीसाठी 1,927 प्रयोगशाळा आहेत, ज्यामुळे चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताची चाचणी क्षमता आता दररोज 15 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात सुमारे 11 लाख चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली.
आगामी काळात, येणारे सणवार आणि उत्सव तसेच हिवाळ्यात आपल्या सर्वांना अत्यंत दक्ष राहून कोविड संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करावे लागेल, असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. अशा काळात आपण निष्काळजीपणा केल्यास, रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.