नवी दिल्ली – लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी कंबर कसून तयारीला लागण्याचा सल्ला कॉंग्रेस हायकमांडने मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला. ईडी आणि पैश्याच्या जोरावर विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रकार भाजपच्या अंगलट येईल, असा दावाही यावेळी कॉंग्रेसकडून करण्यात आला.
महाराष्ट्रातील बड्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना कॉंग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या घडत असलेल्या तमाम राजकीय घडामोडी आणि त्याचा लोकसभेच्या आगामी निवडणुकीवर कोणता परिणाम होण्याची शक्यता आहे याची विस्तृत चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील सर्व मोठे नेते आणि प्रभारीं या बैठकीला उपस्थित होते.
वेणूगोपाल यांनी सांगितले की, हायकमांड आणि महाराष्ट्रातील नेत्यांमधील ही बैठक तब्बल चार चालली. यात प्रामुख्याने लोकसभा निवडणूक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी बंडखोरी या मुद्यावर चर्चा झाली. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी राज्यांतील नेत्यांना आपसातील सर्व मतभेद विसरून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे. तर, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
भारतीय जनता पक्ष सत्ता मिळविण्यासाठी ईडी आणि पैश्याचा वापर करून विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब लोकांच्या लक्षात आली आहे आणि जनता येत्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही वेणूगोपाल यावेळी म्हणाले.
प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाका
लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी राज्यात तीन वेगवेगळ्या मोहिमा राबविण्याचा निर्णय सुध्दा या बैठकीत घेण्यात आला. राज्यांतील सर्व मोठ्या नेत्यांनी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेणे, सप्टेबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या नेत्याच्या अध्यक्षतेखाली पदयात्रा काढणे आणि नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्याता राज्यांत बस यात्रा काढणे असे आजच्या बैठकीत ठरले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर कॉंग्रेसने प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कॉंग्रेस विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. अशात, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करायचा की नाही? आणि करायचा झाला तर कधी करायचा? या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.