काठमांडू :- नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे नेपाळमधील सरकार आणि विरोधकांमध्ये निर्माण झालेली कोंडी अखेर समाप्त झाली आहे. आपण हे वक्तव्य आपण पंतप्रधान पदावर असताना करायला नको होते, असे स्पष्टीकरण प्रचंड यांनी दिले आहे.
नेपाळमध्ये राहणारे सरदार प्रीतम सिंग या उद्योजकाने आपल्याला पंतप्रधान बनण्यासाठी एकदा मदत केली होती, असे प्रचंड गेल्या आठवड्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.
प्रीतम सिंग यांनी राजकीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी काठमांडू ते दिल्ली दरम्यान अनेक फेऱ्या केल्या होत्या. प्रीतम सिंग यांनी भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावल्याचेही प्रचंड म्हणाले होते.
त्यावर नेपाळमधील विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती.
विरोधकांकडून प्रचंड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली होती. मात्र संसदेच्या अधिवेशनादरम्यान संसदेत बोलताना “पंतप्रधान म्हणून आपण असे वक्तव्य करायला नको होते. आपण केवळ एका कन्येचे पिता या नात्याने बोलत होतो.’ असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
आपली कन्या ग्यानू कॅन्सरने आजारी होती. तेंव्हा दिल्लीत उपचारांसाठी गेले असताना प्रीतम सिंग यांनी तेथे वास्तव्याची व्यवस्था केली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.