पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून शिफारस झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते.
या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील कार्यपद्धत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुलाखतीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करून वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी विभागीय मंडळांची स्थापना करणे, उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काही कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे मुलाखतीच्या टप्प्यावर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी २०२३ पासून लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम सेवा अराजपञित, गट -ब मुख्य परीक्षा २०२१च्या राज्य कर निरीक्षक (एसटीआय) संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. एकूण ६०९ उमेदवारांपैकी २४ उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही. त्यामुळे अन्य उमेदवारांची प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची करण्याची शिफारस राज्य शासनाने आयोगाकडे केली होती. त्यानुसार अन्य २४ उमेदवारांचा गुणवत्तेनुसार प्रतिक्षा यादीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार या उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे आयोगाने आज स्पष्ट केले.