MEA Travel Advisory: म्यानमारमधील हिंसाचार आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक सल्ला जारी करून भारतीय नागरिकांना राखीन प्रांतात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच तेथे राहणाऱ्या भारतीयांनी त्वरित परत जाण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. सध्या राखीन प्रांतात राहणाऱ्या भारतीयांनी तातडीने अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देखील मंत्रालयाकडून करण्यात आल्या आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या ॲडव्हायझरीमध्ये, “बिघडत चाललेली सुरक्षा परिस्थिती, लँडलाईनसह सर्व दूरसंचार साधनांमध्ये व्यत्यय आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारच्या राखीन प्रांतात प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” असे म्हटले आहे. दरम्यान, आधीच राखीनमध्ये असलेल्या लोकांना त्वरित स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की परराष्ट्र मंत्रालयाने , म्यानमारमध्ये राहण्याची योजना आखत असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना यंगूनमधील भारतीय दूतावासात नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासात नोंदणी केल्याने नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा भारत सरकारने हाती घेतलेल्या कोणत्याही बचाव मोहिमेमध्ये किंवा इतर सुविधांची गरज भासल्यास त्यांना संरक्षण मिळू शकेल,” असे सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याविषयी माहिती देताना,”म्यानमारमधील अस्थिरतेचा थेट परिणाम आपल्या देशावर होणार आहे. म्यानमारमधील परिस्थितीबद्दल आम्ही खूप चिंतित आहोत. आपला शेजारी देश असल्याने तेथे लोकशाही बहाल व्हावी, अशी आमची इच्छा आहे. भारत सरकार प्रत्येक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.”असे म्हटले आहे.
दरम्यान, 1 फेब्रुवारी 2021 रोजी सैन्याने सत्ता हस्तांतरित केल्यापासून, म्यानमारमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी व्यापक हिंसक निदर्शने होत आहेत. म्यानमारचे सैन्य सशस्त्र लढवय्यांना लक्ष्य करून हवाई हल्ले करत आहे, तर गेल्या काही महिन्यांत म्यानमारमध्ये हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. तीन वांशिक अल्पसंख्याक दलांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लष्करी राजवटीच्या विरोधात एकाच वेळी आक्रमण सुरू केले. जातीय गटाच्या सैन्याने काही शहरे आणि लष्करी चौक्याही ताब्यात घेतल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, किमान 151 म्यानमार सैनिक सशस्त्र वांशिक गटापासून वाचण्यासाठी मिझोराममध्ये पळून गेले.
नोव्हेंबर 2023 मध्ये मिलिशिया-पीपल्स डिफेन्स फोर्स (PDF) ने त्यांच्या छावण्या ताब्यात घेतल्यानंतर सुमारे 104 सैनिक भारत-म्यानमार सीमा ओलांडून मिझोरामला पळून गेले होते. देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारत-म्यानमार सीमेवर म्यानमारमधून मोठ्या संख्येने लोक मिझोराममध्ये येत आहेत. पाहिले तर म्यानमार हा भारताच्या सामरिक शेजारी देशांपैकी एक आहे. भारतातील अनेक ईशान्येकडील राज्यांच्या सीमा म्यानमारशी जोडलेल्या आहेत. भारताची जवळपास 1,640 किमी लांबीची सीमा आहे.