मुंबई – लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी शनिवारी म्हणाले होते, ‘माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’ राहुल गांधीच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील या वक्तव्यावरून फूट पडत असल्याचे चित्र आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वाचे विचारवंत वीर सावरकर यांची पूजा करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नये.
दरम्यान, राज्यातील राजकारण राहुल गांधींच्या वक्तव्यावरून तापले आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुतांश नेत्यांनी आपले प्रोफाईल डीपी बदलले आहेत. ‘मी सावरकर’, ‘आम्ही सारे सावरकर’ असे डीपी नेत्यांच्या प्रोफाईलवर दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपला फेसबुकवरील प्रोफाईल डीपी बदलला असून ‘आम्ही सारे सावरकर’ तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी सावरकर’ असा डीपी ठेवला आहे.
सर्वसामान्य नागरिक संतप्त –
गेल्या चार दिवसांपासून राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. यावरून सर्वसामान्य जनता मात्र संतापली आहे. नेत्यांनी महापुरूषांवरून राजकारण करत न बसता लोकहिताची कामे करावीत, विकासकामांकडे लक्ष द्यावे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आता मध्यस्थी करत राहुल गांधींना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. आणि राहुल गांधी यांनीही शरद पवार यांचा सल्ला मान्य करून सावरकर मुद्यावर आक्रमक होणार नसल्याचे सांगितले आहे.