टोकिओ – जपानमध्ये राजधानी टोकियोच्या पश्चिमेकडील भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रचंड भूस्खलन झाले आहे. चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेली आहेत. या भूस्खलनामुळे किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतामी गावाजवळ हे भूस्खलन झाले असे शिझुओका जिल्ह्याचे प्रवक्ते ताकामिची सुगियामा यांनी सांगितले.
स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेने बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा आकडा 20 असल्याचे म्हटले आहे. मात्र सुगियामा यांनी मरण पावलेल्यांचा आकडा 19 असल्याचे आणि मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच जपानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भूस्खलन झालेल्या भागात फायर फायटर्स आणि पोलीस दलाबरोबर स्व संरक्षण गटाचे कार्यकर्तेही मदतीसाठी रवाना झाले आहेत. या भागात संभाव्य भूस्खलनाचे धोके लक्षात घेऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
हे भूस्खलन अगदी वेगाने झाले त्यामुळे नागरिकांना बचावाची संधीही मिळाली नाही. डोंगर उतारावरून माती आणि चिखलाचा मोठा लोंढा वेगाने घरंगळत आला आणि वाटेतील घरे, कार आणि सर्वकाही त्यात वाहून गेले. दूरवरच्या नागरिकांना हताशपणे ही वाताहत बघत बसावे लागले. या प्रचंड भूस्खलनामुळे एका पूलाचा काही भाग देखील कोसळला आहे, असे स्थानिक वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
आतामी हे गाव राजधानी टोकियोच्या नैऋत्कडे 100 किलोमीटर अंतराववरील शिझुओका जिल्ह्यात आहे. गरम पाण्याचे झरे, रहिवासी भाग, शॉपिंग स्ट्रीट आणि प्राचीन देवस्थानासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.