माधव विद्वांस
काकोरी कटातील क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल व त्यांचे साथीदार अश्फाकउल्ला खान व रोशन सिंग यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचे एक साथीदार राजेंद्रनाथ लाहिरी यांना 17 डिसेंबर 1927 रोजी गोंडा येथे दोन दिवस अगोदर फाशी देण्यात आली. रामप्रसाद बिस्मिल शायर, कवी, अनुवादक, बहुभाषिक, इतिहासकार आणि साहित्यिक देखील होते. “सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल में है।’ ही त्यांची कविता खूप प्रसिद्ध झाली. बिस्मिल हे त्यांचे उर्दूमधील टोपणनाव होते. त्यांना 19 डिसेंबर 1927 रोजी गोरखपूर येथे सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी फाशी देण्यात आली.
अश्फाकउल्ला खान यांना फैजाबाद येथे 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली. अश्फाकउल्ला खान हे पण कवी होते. घोडेस्वारी, बंदूक चालविणे त्यांना अवगत होते. त्यांनी उर्दू व हिंदीत कविता केल्या होत्या. त्यांचे हसरत हे टोपणनाव होते, उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी लेख आणि कविता लिहिल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संपूर्ण इतिहासात बिस्मिल आणि अश्फाकउल्ला यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याची एक अनोखी कथा आहे. रोशन सिंग यांना अलाहाबाद येथे फाशी देण्यात आली. ठाकुर रोशन सिंह यांचे पूर्ण कुटुंब आर्य समाजाशी निगडित होत. असहकार चळवळीमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर आणि बरेली जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोलाचे योगदान दिले. इतकेच नाही तर बरेली येथे झालेल्या गोळीबारात एका पोलिसाची रायफल हिसकावून गोळीबार सुरू केला होता. यावेळी त्यांना अटक होऊन खटला भरण्यात आला होता व 2 वर्षांची कैदही झाली होती.
चौघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी फाशी देण्यात आली. क्रांतिकारकांद्वारे चालवलेल्या स्वातंत्र्यलढ्यास तातडीने निधीची तरतूद करण्याच्या उद्देशाने रामप्रसाद बिस्मिल यांनी शाहजहांपूरमध्ये झालेल्या बैठकीत इंग्रजी सरकारची तिजोरी लुटण्याची योजना आखली. या मोहिमेचे नेतृत्व राजेंद्रनाथ लाहिरी यांचेकडे होते. आठ डाउन सहारनपूर-लखनऊ पॅसेंजर ट्रेनमध्ये खजिना पाठविण्यात येत असल्याची खबर त्यांना लागली होती. रेल्वे काकोरी स्थानकात येताच राजेंद्रनाथ लाहिरी, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, पंडित चंद्रशेखर आझाद आणि इतर 4 साथीदारांच्या मदतीने साखळी खेचून गाडी थांबविली आणि खजिना लुटून पसार झाले.
मात्र तेथे एक चादर राहून गेली व या चादरीने क्रांतिकारक फसले. इंटेलिजन्स प्रमुख खान बहादुर तसद्दुक हुसेन यांनी या प्रकारांची चौकशी सुरू केली. आरोपींना पकडून देणेसाठी बक्षिसेही जाहीर झाली.सखोल चौकशी व तपास केल्यानंतर चादर धुणारा लॉन्ड्रीवाला शाहजहानपूर येथे सापडला. त्याच्याकडून बनारसीलाल यांचे नाव समजले. त्यांना पोलिसांनी पकडले आणि सर्व कट उघडकीस आला. या क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. यातील फाशी झालेले चौघे सोडून इतर 16 जणांना शिक्षा सुनावण्यात आल्या.