नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका हिंदू मुलीने तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मुस्लीम युवकासोबत लग्न केल्यानंतर तिचे पिंड दान करण्याचा कार्यक्रम हिंदू धर्म सेना या संघटनेने आयोजित केला होता. यावेळी या संघटनेकडून जर एखाद्या हिंदू मुलाने मुस्लीम मुलीसोबत लग्न केले तर त्याला रुपये ११ हजारांचे बक्षिस देण्यात येईल,अशी अजब घोषणा करण्यात आली.
दरम्यान, या संघटनेने जाहीर केलेल्या घोषणेमुळे एकच गोंधळ उडाला आहे. हिंदू धर्म सेना नावाच्या संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी ही घोषणा केली आहे. याविषयी बोलताना मुस्लीम युवती आणि हिंदू युवकाच्या प्रेम विवाहाला पाठिंबा देण्यासाठी आपण ही घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.
ज्याप्रकारे मुस्लीम युवक हिंदू मुलींना पळवून नेत आहेत. आमच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये अकडवून त्यांचे धर्मांतर करण्यात येते. हा चिंतेचा विषय आहे. आमच्या हिंदू समाजात तसेही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. या गोष्टीला लक्षात घेऊन हिंदू धर्म सेनेने हा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून हिंदू मुलींचे तर रक्षण करायचे आहेच, त्याशिवाय मुस्लीम मुलींना आपल्याकडे घेऊन यायचे आहे. यासाठी आम्ही हिंदू मुलांना प्रोत्साहित करत असून त्यासाठी रोख अकरा हजारांचे बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू धर्म सेनेच्या या घोषणेनंतर सरकारवर टीका झाली. याबाबत राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आम्ही याप्रकरणाची चौकशी करू. कोणत्या संघटनेने असा प्रस्ताव दिला आहे, त्याचा तपास केला जाईल.
या प्रकरणावर टीका करताना काँग्रेसचे भोपाळचे आमदार आरिफ मसूद यांनी, “हा देश संविधानावर चालतो. आंतरधर्मीय विवाहासाठी आपल्याकडे कायदे केलेले आहेत. तुम्ही लोकांना प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाहीत. पण जेव्हा एखाद्या विशिष्ट समाजाशी निगडित विषय येतो, तेव्हा त्याला लव्ह जिहाद अशी संज्ञा वापरली जाते. पण जेव्हा हाच प्रकार हिंदू धर्म सेनेसारख्या संघटनाकडून करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.” असे म्हटले आहे.