शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस फळ, भाजीपाला विभाग बंद होता. त्यानंतर आज सोमवारी मार्केट सुरू झाले. उद्या मंगळवारी सुरू राहणार आहे. त्यानंतर पाडव्यापासून म्हणजे बुधवारपासून मार्केट पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.
सध्या करोना या गंभीर आजाराने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान कामगार संघटनाही या बंधात सहभागी होणार आहेत .याविषयी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले की, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरचे लोक कामगारांना कामावर पाठवत नाहीत. नेहमीच्या तुलनेत आज केवळ वीस ते पंचवीस टक्केच कामगार कामावर होते.तसेच, बाजारात येणारे लोक कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे बाजारातून कोरूनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. कामगाराला काय झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, त्यामुळे आम्ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.