मराठीतील भावकवी नागोराव घनश्याम देशपांडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी आजोळी सेंदुरजन, ता. सिंदखेडराजा येथे झाला. त्यांचे वडील साखरखेर्डा परगण्याचे (तालुका मेहकर) वतनदार देशपांडे होते.
त्यांचा जन्म अपुऱ्या दिवसांचा असल्यामुळे त्यांचे लहानपण तर अशक्ततेत गेलेच, शिवाय आजारपणही आयुष्यभर पुरले. नागोराव यांचे शालेय शिक्षण मेहकर येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात झाले. त्यांना गणिताची आवड असल्यामुळे त्यांनी आधी बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला परंतु अशक्तपणामुळे प्रयोगशाळेतील सरावासाठी असमर्थता वाटल्याने ते बी.ए.कडे गेले. बी.ए.नंतर ते एम.ए.कडे गेले खरे, तथापि विषमज्वर होऊन पोटाची व्याधी जडल्यामुळे तेही अर्धवट सोडावे लागले. कालांतराने ते एए.एल.बी. झाले.
वर्ष 1929 मध्ये ते बी.ए.ला असताना एके रात्री नागपूरला धनतोलीवरून बर्डीकडे पुलावरून येताना त्यांना रानारानात गेली बाई शीळ ही कविता सुचली. टिपूर चांदणे पडले होते, पुलावरून खाली दिसणारे पाण्यावरही आकाश उतरल्यासारखे वाटत होते.त्याच वेळी बाजूच्या मैदानाकडून बासरीचा आवाज वातावरण मनात ताल उत्पन्न करीत होता व अशा सुंदर वातावरणातच दहा-पंधरा मिनिटांत “शीळ’ कविता लिहून झाली. अशी या कवितेची जन्मकथा त्यांनी सांगितली आहे. जी. एन. जोशी यांनी ही कविता गायनाच्या बैठकीत म्हणावयास सुरुवात केली. त्या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली व कवी म्हणून ना. घ. देशपांडे प्रकाशात आले.
व्यावसायिक गायकाने कवितेला चाल लावून तिची ध्वनिमुद्रिका होण्याचा हा पहिला मानही या कवितेला मिळाला. वर्ष 1935 साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीलाही नाव आणि अर्थप्राप्ती झाली. तसेच जी. एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला. या “शीळे’नेच देशपांडे यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले होते. कालांतराने अर्थार्जनासाठी त्यांनी मेहकर (जिल्हा बुलढाणा) येथे वकिलीस सुरुवात केली.
मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. त्यांनी काही काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरूष निवेदक असत. त्यावेळी स्त्रियांच्या आवाजाचा स्वर पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे, अशी देशपांडेंनी केलेली सूचना केंद्राने मान्य केली व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला.
ना. घ. देशपांडे यांच्या कवितेमधून दुःख, आनंद, प्रेमभाव, वियोग, सामाजिक शल्ये, निसर्ग यांचे सुंदर दर्शन घडते.
“निःश्वास गीतावली’ ही आईच्या निधनावरील शोक व्यक्त करणारी कविता सुमंदारमाला या पल्लेदार वृत्तात लिहिली आहे. “तुझे भास होतात कित्येक आता अहोरात्र येते स्मृती अंतरी। हळू फाटणाऱ्या ढगांतून काळ्या जशी पाझरे चंद्रिका पांढरी’ या शब्दांत आईच्या आठवणीने व्याकूळ झालेले त्यांचे मनाचे दर्शन होते. काळाच्या ओघात त्यांच्या कविता छंदोबद्धतेकडून मुक्तछंदाकडे वळल्याचे जाणवते. “अभिसार’ या त्यांच्या काव्यसंग्रहातून नायक नायिकांची मिलनाची ओढ व मुक्त प्रेमजीवनाविषयीची आसक्ती डोकावते. यातील प्रेमप्रसंगाला साजेसे तारे चांदण्या व निसर्ग यांचा सुंदर समन्वय साधला आहे. सोप्या संस्कृत तसेच ग्रामीण शब्दांचा वापर असल्याने सामान्य वाचकाला त्याचा अर्थ लावता येतो.
त्यांच्या “खूणगाठी’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली साहित्य वाचस्पती ही उपाधी आणि विदर्भ साहित्य संघाचा अत्यंत मानाचा “जीवनव्रती’ पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी व मानसन्मानांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली. इ.स. 1984 साली त्यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून विदर्भ साहित्य संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले होते. 10 मे 2000 रोजी त्यांचे निधन झाले.