पुणे, दि. 7 -“मराठी कलाकारांच्या आणि उद्योजकांच्या नावाची चर्चा दिल्लीत झाली पाहिजे. त्यासाठी मराठी कलाकारांनी दिल्लीत येऊन सादरीकरण करावीत. मराठी माणूस दिल्लीत जाण्यास नेहमीच संकोच करत आला आहे. सांस्कृतिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांबाबत हीच परिस्थिती असून ती बदलली पाहिजे,’ असे मत अखिल भारतीय सांस्कृतिक संबंध (आयसीसीआर) परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांना समाजस्नेह पुरस्कार, अभिनेते प्रशांत दामले यांना समाजभूषण पुरस्कार, तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांना युवा गौरव आणि उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांना उद्योगरत्न पुरस्कार डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
पं. अतुलशास्त्री भगरे, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अंकित काणे आदी यावेळी उपस्थित होते.
निकम म्हणाले, “वकील हे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करतात, असा समाजात गैरसमज आहे. परंतु वकिलांची भूमिका वेगळी असते. माझ्यासमोरही गुन्हेगारांची बाजू घ्यावी की सत्याच्या बाजूने लढावे, असा पेच निर्माण झाला होता. मात्र, मी योग्य बाजू निवडली.’ अभिनेते दामले यांनी नाटकाच्या प्रयोगांबाबत काही मजेशीर आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “माझ्या सहकारी कलाकारांमुळेच मला 12 हजारांहून अधिक प्रयोग करणे शक्य झाले. कोणतीही नाटकाची टीम एकमेकांना सांभाळून घेते तेव्हा ते नाटक चांगले होते,’ असे दामले यांनी नमूद केले. अतुलशास्त्री भगरे यांनी प्रास्ताविक, तर अंकित काणे यांनी आभार मानले.