पुणे, दि. 7 – “राजकारणांतील आघाड्यांमुळे शालेय व क्रीडा विभागासाठी वेगवेगळे मंत्री आहेत. मात्र, शाळा आणि क्रीडा हा विभाग एकत्र असायला हवा. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे एकत्र बैठक घेऊन काम करू. क्रीडा आणि शिक्षण खात्याने एकत्र काम केले पाहिजे, मंत्रीही एकच असायला हवा,’ असे स्पष्ट मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभात केसरकर बोलत होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापक सुनील शिवले आदी या वेळी उपस्थित होते. अमृत कलश या अमृतमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. के. एच. संचेती यांना सन्मानित करण्यात आले.
केसरकर म्हणाले, “शारीरिक शिक्षणाचा वर्ग चार-पाच शाळांना मिळून घेण्याचा प्रयत्न आहे. सर्व शाळांना शारीरिक शिक्षणाचे शिक्षक देणे शक्य नाही. शिक्षकांची जबाबदारी पुस्तकांपलीकडे आहे. मुलांना शिकवणी लावण्याची वेळ येता कामा नये. आयसीएसई, सीबीएसई शाळा सुरू करण्याचा विचार आहे. मराठी शाळांमध्ये आता इंग्रजीही शिकवले जाते. पण, सर्वोत्कृष्ट शिक्षण मात्र मातृभाषेतून मिळते.’
..पण, मुलांनी खेळलेही पाहिजे
मुलांचा गृहपाठ बंद करावा असे वाटत नाही, पण बालवाडीपासूनच गृहपाठ दिला जातो. गृहपाठ कोणत्या वर्गापासून द्यायचा विचार करायला हवा. गृहपाठ सक्तीचा झाला आहे. पण, मुलांनी खेळलेही पाहिजे. मुले शाळेत लिहीत राहतात, घरीही लिहीत राहतात. मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, याकडे शालेय शिक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले.