मुंबई – मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले आहे. तसेच आंदोलन हिंसक होऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. तसेच उद्यापासून 11 हजार 530 जणांना कुणबी दाखले दण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
– न्या. शिंदे समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे, कॅबिनेटमध्ये स्वीकारून पुढची प्रक्रिया केली जाणार आहे.
– समितीने दोन महिन्यांनी मुदत मागितली आहे. सरकारने दोन महिन्याची मुदत दिली आहे. त्यांच्या कामाचा आवाका मोठा आहे, लवकरात लवकर आपला अंतिम अहवाल सादर करा असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच क्युरेटिव्ह पिटीशन यासंदर्भात दाखल केली आहे. यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मागास आयोगाला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. इतर संस्था सुद्धा त्यांना मदत करणार आहेत. क्युरेटिव्ह पिटीशन मधून मराठा समाज मागास आहे ते सिद्ध करता येईल.
– मूळ मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले त्यावर सरकार काम करत आहे. तज्ज्ञ संस्था समितीला मदत करणार आहेत. सुप्रीम कोर्टाने मागे ज्या त्रुटी काढल्या आहेत त्या दूर करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.
– कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचे काम आम्ही करू. मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी आणि आपले उपसमिती सदस्य आणि अधिकारी यांच्याशी उद्या चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की, थोडा वेळ सरकारला दिला पाहिजे. मराठा समाज शिस्तप्रिय आहे तरी काही लोक जाळपोळ तोडफोड केली जात आहे. मराठा समाजाला विनंती करतो की टोकाचे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाचा विचार करा ! आम्ही आरक्षण देणारे आहोत. शांततेचे आवाहन आम्ही सगळ्यांना करतो.
– मागील सरकारचे अपयश आहे, त्यांना मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवता आले नाही. कुठल्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हेमंत पाटील यांनी भावनेपोटी राजीनामा दिला असेल माझे त्यांच्याही बोलणे झाले आहे. हे आंदोलन भरकटत जात आहे.