पळसदेव, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर पळसदेवमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.
पळसदेवमधील सर्वच मराठा समाजबांधवांच्या वतीने इतर कोणत्याच राजकीय पक्षांच्या प्रचार सभाला उपस्थित राहायचे नाही, एकही मराठा समाजाच्या कार्यकर्त्याने इतर पक्षाचे पोलिंग एजंट म्हणूण काम करायचे नाही व प्रचार करायचा नाही, असा निर्धार समाजाच्या वतीने करण्यात आला.
पळसदेव (ता. इंदापूर) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आक्रमक भूमिका घेतली. शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी 8 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठा समाजाची निर्णायक बैठक पार पडली. यामध्ये गावातील सर्वच मराठा समाजाच्या वतीने प्रवीण काळे व गजानन गांधले यांना बारामती लोकसभा उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
सर्व मराठा समाजाच्या वतीने या दोन उमेदवारांचा प्रचार करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. सोबतच मराठा समाजाच्या एकाही व्यक्तीने इतर राजकीय पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही. त्यांच्या प्रचारसभांना उपस्थित राहायचे नाही, शिवाय त्यांचे पोलिंग एजंट म्हणूनदेखील काम करायचे नाही व मराठा समाजाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला.
सुरुवातीपासून पुणे जिल्ह्यातील पळसदेव गावात मराठा आरक्षण मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात आंदोलने, मोर्चे, रस्ता रोको करण्यात आले. सध्या देखील सगेसोयरेवरून गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. इंदापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या पळसदेव गावाला महत्वाचे स्थान आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पळसदेव गाव आपल्या विचाराचे असावे, अशी धारणा सर्वच राजकीय पक्ष बाळगून असतात.
पवार कुटुंबाची अडचण?
यावेळी पवार घराण्यात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीतही या गावाचं मतदान महत्वाचं ठरणार आहे. त्यात गावातील मराठा समाजाच्या वतीने दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे याचा मोठा फटका दोन्ही पवार गटाला बसणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटाला प्रचार करताना देखील या गावात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.