संतोष पवार
अनेक ठिकाणी नुसता धुरळा; लाखोंचा कर, मात्र सुविधांची वानवा
सातारा – आज खेडोपाडी रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. गल्ली बोळापर्यंत डांबरी, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते विविध योजनांमधून तयार होत आहेत. साताऱ्यानजिकच्या शाहूपुरीत मात्र अद्यापही अनेक वसाहती पक्क्या रस्त्याविना आहेत. अनेक रस्त्यांवर टाकलेली खडी वाहून गेली आहे. तर अनेक ठिकाणी नुसताच धुरळा उडत आहे. वास्तविक शाहूपुरी ग्रामपंचायतीचा विस्तार झाल्याने लाखो रुपयांचा महसूल वाढला आहे. मात्र अद्यापही शाहूपुरीत अनेक वसाहतीत मूलभूत सुविधांची वानवा असल्याने शाहूपुरीकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा शहरानजिकची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीतील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. करातून मिळणारे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढलेले असताना शाहूपुरी विकासात मागे का राहत आहे? याचाही विचार करण्याची गरज आहे. नवीन वसाहती निर्माण झाल्या या वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात कर रुपाने उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. मात्र या वसाहतींमध्ये विकासकामे होणे अपेक्षित असतानाही अनेक वसाहतींमध्ये शासकीय योजनांमधून कामेच होत नाही. अनेक वसाहतीत रस्त्याची समस्या गंभीर आहे. पावसाळ्यात या वसाहतीत दुचाकी चालवणेही जिकरीचे बनते. अशी भयानक परिस्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रस्त्याची आज दयनीय अवस्था आहे. तर अनेक रस्ते दरवर्षी करावे लागत आहेत. रस्त्याची कामे काही भागात अद्यापही सुरु आहेत मात्र त्याकामांची क्वॉलिटी कंट्रोलद्वारे तपासणी करण्याची गरज आहे. वारंवार एकाच रस्त्यावर निधी पडत असताना दुसरीकडे मात्र दुजाभाव दिसून येत आहे. अनेक रस्त्यांवर पहिल्यापासून निधीच पडलेला नाही. ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील मुख्य रस्तेच खड्डेमय असल्याने अंतर्गत रस्त्यांचा तर विचार न केलेलाच बरा.
गडकर आळीतून पार्थ पोळके यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे समतापार्क परिसरातील रस्त्यांकडेही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. अशीच परिस्थिती आंबेदरे रोडलगतच्या अनेक वसाहतींमध्ये आहे.
रस्त्यांच्या कामांसाठी खासदार, आमदार फंडातून कामे मंजूर होतात. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या फंडातूनही कामे होतात.
ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतूनही कामे होतात. समाजकल्याण विभागाच्या निधीतूनही कामे होतात. मग शाहूपुरीत नेहमी ही कामे कोणत्या भागात होतात याचीही माहिती मिळणे गरजेचे आहे. शाहूपुरीतील अनेक रस्त्यांची कामे मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप तरी काही ठराविक भागातीलच कामे सुरु आहेत. त्यामुळे जर मंजूर कामे आहेत तर ती पावसाळ्यापूर्वी करण्याची गरज असून याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
“कही खुशी कही गम’
शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक भागात रस्त्यांची परिस्थिती नेहमीच चांगली राहिली आहे. तर अनेक भागात रस्त्याची दयनीय अवस्था दिसून येते. वास्तविक कर सगळेच भरतात मग असा दुजाभाव ग्रामपंचायत का करते असा सवाल अन्याय होत असलेले करतात करताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीत सत्ता कोणाची आहे, विरोधात कोण आहे, याचा विचार करण्यापेक्षा सर्व शाहूपुरीकर आपले आहेत, असा विचार ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मग प्रत्यक्षात असा विचार होतोय का? हेही तपासणे गरजेचे बनले आहे.
आमचे रस्ते कधी होणार?
शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सरस्वती कॉलनी, शिवपार्वतीनगर, अरुणोदय कॉलनी, सोमेश्वर कॉलनी, शिवाजी नगरचा काही भाग, सारडा कॉलनी, समता पार्क, झेडपी कॉलनी, तामजाईनगरमधील काही भाग, दौलतनगरमधील काही भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. काही ठिकाणी टाकलेली खडी गायब झाली आहे. अशी भयानक परिस्थिती असल्याने या भागातील नागरिकांनी आमचे रस्ते कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.