मंचर – आंबेगाव तालुक्यातील लौकी, कळंब, चांडोली येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान झाले आहे. द्राक्ष तोडणी थंडावली आहे. स्थानिक बाजारपेठेतही मागणी घटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची द्राक्षे विक्रीअभावी बागेत सडत आहेत. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.
द्राक्ष पिकासाठी घेतलेले कर्ज मानगुटीवर आहे. त्यातच पीक विम्याच्या जाचक अटीमुळे लाभ मिळत नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, द्राक्षांच्या विक्रीअभावी शेतकऱ्यांनी मनुक्याची निर्मिती सुरू केली आहे.
कळंब, चांडोली बुद्रुक, लौकी भागात सुमारे शंभर एकरांहून अधिक क्षेत्रात द्राक्ष लागवड केली आहे. या भागात पिकवलेली द्राक्षे बांगलादेश, श्रीलंका, रशिया, ऑस्टेलिया, युरोप, इंग्लंड आदी देशात निर्यात केली जातात.
स्थानिक बाजारपेठेतही त्यांना मोठी मागणी असते. दि. 10 ऑक्टोबर ते 25 फेब्रुवारीपर्यंत द्राक्षाचा हंगाम सुरळीत सुरू होता; परंतु त्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विक्रीक्षम बागांवर संक्रांत आली आहे. पूर्ण वाढ झालेल्या द्राक्षांचे घड जमिनीवर पडले आहेत. लौकी येथील शेतकरी दिनकर थोरात यांची दीड एकर व अविनाश थोरात यांची बारा एकर क्षेत्रात द्राक्षबाग आहे.
त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निर्यात होत नसल्याने स्थानिक बाजारपेठेत लॉकडॉऊनमुळे द्राक्षांची विक्री होत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मनुके बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड एकरात द्राक्षबाग असून लॉकडाऊनमुळे आतापर्यंत 50 टक्के पीक वाया गेले आहे. सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पीक विम्यासाठी
15 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत 72 टक्के पाऊस व 100 टक्के नुकसान झाले पाहिजे, अशी अट असल्याने पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही. तरी शासनाने द्राक्ष बागायतदारांचा विचार करून काही जाचक अटी काढून नुकसान भरपाई द्यावी.
– दिनकर थोरात, द्राक्ष उत्पादक शेतकरी, लौकी.
दोन कोटींच्या परकीय चलनावर पाणी आंबेगाव तालुक्यातून 100 एकर बागेतील द्राक्षे निर्यात केली जातात. एकरी सरासरी 15 ते 20 टन उत्पादन निघते. या द्राक्षांना प्रतवारीनुसार सरासरी 120 ते 130 भाव मिळतो. मात्र, लॉकडाऊन आणि अवकाळीमुळे निर्यातक्षम द्राक्षांचा बाजार थंडावला आहे.
त्याचा फटका निर्यातदार द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. निर्यातीतून आंबेगाव तालुक्याला दरवर्षी 2 कोटी 60 लाख रुपये परकीय चलन मिळते. मात्र, हा बाजार आता अडचणीत आला आहे.
मनुक्याच्या निर्मितीवरही परिणाम
कौस्तुभ थोरात म्हणाले की, लौकी परिसरातील शेतकऱ्यांनी 25 एकर बागा या मनुक्यासाठी निवडल्या आहेत. एकरी 6 ते 8 टन उत्पादन निघणाऱ्या द्राक्षांतून आता 3 ते 4 टन मनुके तयार होणार आहेत.विक्रीक्षम मनुक्याला 50 ते 60 रुपये बाजारभाव मिळतो.
मात्र, मनुके तयार करताना पुन्हा अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे मनुक्यात किड निर्माण होत आहे. किड लागलेल्या मनुक्याला कवडीमोल भावात विकावे लागणार आहे.