स्वप्निल श्रोत्री
भारत व जपान हे एकमेकांचे विश्वासू मित्र आहेत. त्यांच्यातील क्षमता व त्रुटी या एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांचा हात धरून राहिले तर दोघांचाही विकास होणार आहे.
2022 हे वर्ष भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना भारत व जपान या दोन प्रमुख आशियायी राष्ट्रांच्या द्विपक्षीय संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत आहेत.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि जपानचे तात्कालीन पंतप्रधान शिगेरु योशिदा यांच्यापासून सुरू झालेले भारत-जपान द्विपक्षीय मैत्रीसंबंध आज भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमिओ किशीदा यांच्यापर्यंत आलेले आहेत.
आधुनिक काळातील हे मैत्रीसंबंध भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरू झाले असले तरी दोन्ही देशांचे मैत्रीसंबंध हे ऐतिहासिक आहेत. बौद्ध धर्माच्या उगमापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लष्करी साहाय्य करण्यापर्यंत अशा अनेक गोष्टीं दोन्ही राष्ट्रांचे संबंध हे ऐतिहासिक असल्याची साक्ष देतात.
आज जपान भारताचा विश्वासू मित्र असला तरी पूर्वी या संबंधात अनेकदा चढ-उतार आले आहेत. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात वर्ष 1998 मध्ये भारताने जेव्हा अण्वस्र चाचण्या घेतल्या होत्या; त्यावेळी भारताला सर्वात जास्त जपानच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जपानने भारताविरोधात आघाडी उघडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यास सुरुवात केली होती. अण्वस्त्रांच्या बाबतीत जपान हा अत्यंत संवेदनशील देश आहे. कारण, आजपर्यंत फक्त एकाच देशावर अण्वस्त्रे पडली आहेत आणि तो देश म्हणजे जपान.
भारताच्या अण्वस्त्र चाचणीनंतर जपानने भारतावर निर्बंध लावले असले तरीही ते जास्त दिवस चालले नाहीत. कारण, भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर प्रगती करीत होती व चीन विरोधात आघाडी उघडण्यासाठी अमेरिका व जपान यांना भारताची गरज होती. आपण जर अजून इतिहासात गेलो तर शीतयुद्धाच्या काळात भारत व जपान यांच्यात असे काही खास संबंध नव्हते. कारण, जपान हा सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या गटात सामील असणारा देश आहे. भारत हा अलिप्तवादी चळवळीत असला तरीही ओढा हा प्रामुख्याने रशियाकडे (यूएसएसआर) अधिक होता.
परंतु, वर्ष 2006 पासून भारत व जपान यांच्यात वार्षिक बैठका (ही बैठक एक वर्ष भारत व एक वर्ष जपान अशी असते) सुरू झाल्या आहेत. तेव्हापासून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. जसे वर्ष 2013 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा भारतातील पहिली अति वेगवान रेल्वे (बुलेट ट्रेन) ची घोषणा करण्यात आली. बुलेट ट्रेन हा प्रकल्प भारतात जपानच्या मदतीने सुरू आहे. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये विकासासाठी जपान हा प्रयत्नशील आहे, जपान हा भारतातील सर्वात मोठा देणगीदार असून भारतातील तिसरी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ही जपानकडून येते.
दोन्ही देशांमध्ये विज्ञान व अंतराळात प्रगती करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासंबंधी करार झाले आहेत. भारत व जपान यांच्यात एकत्रित लष्करी सराव वेळोवेळी होत असतात. आंतरराष्ट्रीय व सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर जपान भारताला साथ देतो तर उत्तर कोरियाकडे असलेल्या अण्वस्त्रांवरून अमेरिका व उत्तर कोरिया त्यांच्यात जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा, त्याचा धोका जपानलाही असतो अशा वेळी भारत जपानची बाजू घेतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, दोन्ही देश एकमेकांना पूरक अशी भूमिका घेतात.
भारत व जपान ही दोन राष्ट्रे अनेक बाबतींमध्ये समान व एकमेकांना पूरक आहेत.
1) जपान हा एक लोकशाही प्रधान देश आहे, तर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. 2) जपानमध्ये बौद्ध धर्माचे पालन केले जाते, तर भारत हे बौद्ध धर्माचे उगमस्थान आहे. 3) सध्या जपानमध्ये नागरिकांचे सरासरी वय हे 48 ते 50 च्या दरम्यान आहे, तर भारतातील तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जपानमध्ये उद्योगधंदे चालवण्यासाठी भारत जपानला मोठ्या प्रमाणावर कुशल कारागीरांचा पुरवठा करू शकतो. 4) तंत्रज्ञान क्षेत्रात जपानची कुशलता आहे; मोठा पैसा आहे. त्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी होऊ शकतो.
याशिवाय भारत-जपान यांच्या संबंधात सुधारणा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीन हे आहे. गेल्या 15 वर्षांत चीन ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःला उभे करीत आहे. त्यामुळे भारत व जपान ही दोन राष्ट्रे अजून जवळ आली. कारण या दोन्ही राष्ट्रांना असं वाटते की, चीन हा आपला सामाईक शत्रू आहे. “शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे ही दोन राष्ट्रे एकत्र आली आहेत. किंबहुना अमेरिका व भारत संबंधात सुधारणा होण्याचे प्रमुख कारणसुद्धा चीन हेच आहे.
गेल्या 15 वर्षांत भारत व जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारले असले तरीही अनेक मुद्द्यांवरून दोन्ही देशात मतभेद आहेत. 2017 मध्ये चीनला विरोध करण्यासाठी भारत, जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांनी क्वॉड गट (ग्रुप) तयार केला होता. परंतु, त्याचे भविष्य अजून अधांतरीच आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशेटिव्हला पर्याय म्हणून भारत व जपान यांनी “आशिया-आफ्रिका विकास मार्ग’ (ग्रोथ कॉरिडोर) नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी भारत 10 अब्ज तर जपान 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
परंतु, क्वॉडप्रमाणे हा प्रकल्पसुद्धा फक्त कागदावरच आहे. भारत व जपान यांच्यात वर्षाला फक्त 15 अब्ज डॉलरचा व्यापार होतो, तर जपान व चीन यांच्यात वर्षाला 300 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. भारत व जपान यांच्यात व्यापार वाढीसाठी प्रचंड वाव असूनही वाढीचे प्रयत्न झाले नाहीत. गेल्या 7 वर्षांपासून भारत व जपान यांच्यातील विमान खरेदी अडकून पडली आहे. भारत जपानकडून शीनमायवा यूएस-2 अँफिबियन विमान खरेदी करण्यास उत्सुक आहे. परंतु, विमानाच्या किमतीवरून दोन्ही देशात मतभेद आहेत. दोन्ही देशात याशिवाय अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मतभेद आहेत.